पंचायत समिती उमरखेड तर्फे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा स्व. भाऊसाहेब माने "आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी देखील सन २०२५ चा हा पुरस्कार वितरण सोहळा उमरखेड येथील पंचायत समिती सभागृहात पार पडला.कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कोळपे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजयराव माने, गटशिक्षणाधिकारी विजय बेतेवाड, सेवानिवृत्त नायब तहसीलदार शिंदे तसेच सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील २१ शिक्षकांना भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणणारे, पंचायत समिती उमरखेडचे पहिले सभापती, सलग दोन वेळा आमदार राहिलेले व सहकार व शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असलेले सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब माने यांच्या कार्याचा गौरव करत डॉ. विजयराव माने यांनी मार्गदर्शन केले. १९३२ दरम्यान शिक्षक म्हणून कार्याची सुरुवात करून समाजजागृतीचे कार्य करणाऱ्या भाऊसाहेबांनी हैदराबाद मुक्ती संग्राम काळातील उंमरी बँक दरोडा प्रकरणात सहभाग घेतल्याने त्यांना भूमिगत व्हावे लागले त्यामुळे शिक्षकीय सेवेचा राजीनामा देऊन राष्ट्रहितासाठी त्यांनी आपली शिक्षकीय सेवा त्यागून त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ समाजकार्याचा मार्ग स्वीकारला. शिक्षण, सहकार व सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार अधिक महत्त्वपूर्ण ठरतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी तुळशीराम भरकाडे (टेंभुरदरा), अशोक मुकावर (विडुळ), यशवंत कदम (कारखेड), चिन्नू निरजंने (माणकेश्वर), रंजना मुनेश्वर (सुकळी), विजयकुमार कोकरे (बिटरगाव), जयराम आसोले (भवानी), वर्षाताई गुट्टे (कोर्टा), मारुती कोकाटे (गाडी), दुर्गा पातंगवार (पोफळी), भारत चौरे (दत्तनगर), शीतल ठाकरे (मुळावा), प्रताप मुंजाळ (शंकर वाडी), रमेश विणकरे (चिंचोली स.), विनोद नरवाडे (बिटरगाव नवी आबादी), केंद्रप्रमुख परसराम कर्णवाड, केंद्रप्रमुख अरुण बुरकुले, रविंद्र चव्हाण, दिव्यांग शिक्षक विष्णू धुळे, छाया चाकोरे (नागापूर) यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या वर्षी सन्मानित शिक्षकांनी आपल्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भावी पिढी घडेल, असा विश्वास अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी व्यक्त केला.य यावेळी यशवंत कदम, वर्षा गुट्टे, रविंद्र चव्हाण सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी संतोष घुगे यांनी तर संचलन डॉ. विनय चव्हाण यांनी आभार केंद्रप्रमुख आनंद देशमुख यांनी मानले.
0 Comments